समर्थ वाणी

ओवी

जे जे नर देह धरुनी आले l

ते ते काही करून गेले l

हरिभजने पावन झाले l

किती येक l

अर्थ....

      मानवी देह धारण करून

जे महापुरुष मान्यता पावले, 

त्यांनी आपल्या जीवनात खूप

मोठे कार्य केले.काहींनी  भक्ती मार्ग शिकवला तर काहींनी जगाच्या भल्यासाठी 

आपले तन,मन, धन अर्पण केले. कित्येक लोकांनी आपला प्रपंच सोडला. घरादारावर तुळशी पत्र ठेवले.

देश, देव, धर्म यासाठी सर्वस्वाचे बलिदान दिले.

कोणी समाजसेवेसाठी स्वतःला झोकून दिले. कोणी

देशसेवा केली. कोणी कला, साहित्य,संगीत,या द्वारे लोक

जागृती केली.काहींना अल्प 

आयुष्य लाभून कल्पनातीत कार्य केले. त्यांच्या कार्याने 

समाजात खुप मोठा बदल झाला.प्रगती, शांती, न्याय, निती,सुधारणा घडून आल्या.

वाईट परंपरा,चालीरीती, अशा गोष्टींचे समूळ उच्चाटन

झाले.लोक सन्मार्गाला लागले.



   साधू संतांच्या कार्याचा जनमानसावर एवढा परिणाम झाला, त्यांनी त्यांचे शिष्यत्व

पत्करले.समाजातील वाईट प्रवृतीची माणसे आमूलाग्र

बदलली. संत जसे उपदेश 

करीत तसे ते स्वतः वागून 

दाखवत. याचा फार मोठा 

परिणाम होत असे.

बोले तैसा चाले. हे त्यांचे

व्रत होते.जनमानसात त्यांनी

भक्तीचा प्रचार केला. त्यांनी

आपले विचार ग्रंथरूपाने 

अजरामर केले.  तेच आज आपल्याला उत्तम वर्तनासाठी उपयोगी ठरतात. आज ते देहात नसले तरी त्यांचे विचार

तेवढेच उपयुक्त ठरतात. 

त्यांचा ग्रंथररुपी ठेवा त्यांच्या 

अस्तित्वाची खूण आहे.

जगात आज जो काही चांगल

आहे ते केवळ त्यांच्या 

विचारांचा प्रभाव आहे. तीच त्यांची पुण्याई आहे.ईश्वरी

सत्ता या लोकांच्याद्वारे कार्य 

करीत असते. या महान 

विभूती होऊन गेल्या त्यांचे

कष्ट हेच आपले जीवन योग्य रीतीने घडण्यास मदत होते.

ते सर्वांचे आदर्श असतात.

येणाऱ्या अनेक पिढयांना

मार्गदर्शक असतात.त्यांच्या

या कामासाठी देव सुद्धा ऋणी असतो. ते स्वतः आपल्या कार्याने पावन होतात व इतर हजारो लाखो 

लोकांचे जीवन पावन करतात

त्यांनी आपला देह योग्य कामासाठी वापरला.त्याचे 

सार्थक केले.हरी भजनाने 

हरीमय झाले.

जय जय रघुवीर समर्थ