ॐ सहनाववतु | सह नौ भुनक्तु |

सह वीर्यं करवावहै |

तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै ||

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।।


हा शांती मंत्र आपल्याकडे म्हंटला जातो. अभ्यास सुरु करण्यापूर्वी किंवा शिकण्याचा एखादा उपक्रम सुरु करण्यापूर्वी व अगदी योगअभ्यासापूर्वी या मंत्राचा उपयोग केला जातो. गुरु आणि शिष्य यांना उद्देशून हा मंत्र म्हटला जातो. या मंत्राचा अर्थ आहे, आपल्या दोघांचे म्हणजे गुरु आणि शिष्य यांचे रक्षण होवो. आपण एकत्र या मंत्राचे वाचन, श्रवण आणि मनन करुया. आपल्या दोघांच्या प्रयत्नांमुळे आपले अध्ययन अधिक तेजस्वी करूया. आपल्या दोघांमध्ये कुणाबद्दलही द्वेष असू नये.


या शांती मंत्राचा मुख्य गाभा म्हणजे तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै|| याचा अर्थ आपल्या दोघांमध्ये भांडणे होवू नयेत किंवा द्वेष निर्माण होवू नये. कारण जेव्हा एखाद्याला थोडेसे ज्ञान प्राप्त होते तेव्हा कुठेतरी त्याचा अहंकार फुगतो आणि त्यातून सुरु होणाऱ्या चर्चेचे रुपांतर भांडणात होते. खरंतर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर चर्चा नक्की व्हायला हवी पण त्या चर्चेतून काहीतरी चांगलं घडायला हवं. त्यासाठी उष्णतेऐवजी प्रकाश निर्माण व्हायला असे उदाहरण देण्यात आले आहे. हा मंत्र कृष्ण यजुर्वेदमधील आहे. येथून अनेक उपनिषदांमध्ये हा मंत्र वापरण्यात आला आहे. जसे श्वेताश्वतर उपनिषद, कठ उपनिषद, इशा उपनिषद आणि केना उपनिषद. प्रत्येक ठिकाणी या मंत्राचा अर्थ शांती मंत्र असाच आहे.


या मंत्रामध्ये अनेक संस्कृत शब्द घेतलेले आहेत. ओम हा हिंदू धर्मातील एक विशिष्ट ध्वनी शब्द आहे. मनाला आणि आत्म्याला शांती देणारा असा हा ध्वनी आहे. ओम म्हणजे दैवी प्रतीक असेही मानले जाते. साहाचा अर्थ एकत्र, नौ म्हणजे दोन्ही आणि अवतु म्हणजे तो सुरक्षित करू शकतो असा अर्थ आहे. हा मंत्र दैवी वैश्विक चेतनेपासून संरक्षण देण्याची विनंती करतो. याव्यतिरिक्त, हा एक शांती मंत्र मानला जातो. शांततेसाठी जप किंवा प्रार्थना म्हणून ही तुम्ही ‘ॐ सहनाववतु | सह नौ भुनक्तु’ म्हणू शकता. शिक्षक आणि विद्यार्थी एकत्र मिळून जेव्हा हा शांती मंत्र म्हणतात, त्यावेळी दैवी आशिर्वादासाठी आवाहन केले जाते. जे काही शिक्षण घेतले जात आहे त्यासोबत एक दैवी आशिर्वाद असू दे, म्हणून हा मंत्र म्हटला जातो. कमीत कमी तीन वेळा तरी हा शांती मंत्र म्हणायला हवा असे सांगितले जाते.


ॐ सहनाववतु | सह नौ भुनक्तु | या मंत्राला शांती मंत्रासह अध्यापन मंत्र असेही म्हणतात. विद्यार्थी आणि शिक्षकांना हा मंत्र एकत्र ठेवतो, त्यांना एकप्रकारे दैवी संरक्षण देतो असे म्हणतात. या दोघांमध्ये जर कोणती नकारात्मक शक्ती असेल तर ती दूर करण्याचे काम हा मंत्र करतो. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील सुसंवाद चांगला व्हावा यासाठी हा मंत्र म्हंटला जातो. या मंत्रामध्ये  ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।। असे तीनवेळा म्हटले आहे. शांततेचा पुनरुच्चार तीनवेळा करण्यात आला आहे. पहिला ॐ शान्तिः म्हणजे शरीरातील दुःख दूर करणे. दुसऱ्यांदा शांती म्हटले आहे, कारण नकारात्मक भावना आणि काळजीने मनाला मुक्त करणे. तिसऱ्यांदा शांती असे म्हणून आत्म्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


ॐ सह नाववतु – आमचे एकसाथ रक्षण करा

सह नौ भुनक्तु – आमचे एकसाथ पालनपोषण करा

सह वीर्यं करवावहै – आम्हा दोघांना एकसाथ पराक्रमी बनवा

तेजस्विनावधीतमस्तु – आम्ही दोघे जे शास्त्र शिकलेले आहोत ते तेजस्वी होवू दे

मा विद्‌विषावहै – आम्ही गुरु-शिष्य एकमेकांचा द्वेष करणार नाही

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः।।